जय मल्हार हायस्कूल जांबुत येथे १८ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
२००७-०८च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात
टाकळी हाजी (प्रतिनिधी):
जांबुत येथील जय मल्हार हायस्कूलमध्ये तब्बल १८ वर्षांनंतर २००७-०८च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र-मैत्रिणींनी पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.या स्नेहमेळाव्यास तब्बल ७० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.अनेक वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि भावनांचा संगम पाहायला मिळाला.

जय मल्हार हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उपस्थित विद्यार्थ्यांना फेटा बांधून सन्मान करण्यात आला.यानंतर शाळेच्या वतीने व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा फुलगुच्छ, शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी आपल्या जुन्या वर्गखोल्यांमध्ये जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.मित्रमंडळींनी गप्पा,हास्यविनोद आणि फोटोसेशनचा मनमुराद आनंद घेतला.
त्यानंतर पंचतळे येथील चारंगबाबा कृषी पर्यटन मंगल कार्यालय येथे सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्गमित्र तथा भैरवनाथ केटर्सचे निलेश पडवळ यांनी स्वादिष्ट भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती.दुपारच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याने समोर येऊन स्वतःचा परिचय दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोगत, आठवणी, संगीत, नृत्य तसेच विविध खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महेश पारखे यांनी तर प्रास्ताविक गोरक्ष गाजरे यांनी तर युवा उद्योजक भास्कर गांजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी २००७-०८ च्या बॅचकडून शाळेला एक स्मार्ट एलइडी टीव्ही तसेच ठराविक रक्कम भेट देण्याची घोषणा करण्यात आली.
शाळेतील मैत्री ही निरागस असते.१८वर्षांनी भेटलो तरी त्यातील जिव्हाळा आणि प्रेम तसेच कायम आहे. सर्वांना भेटून मनस्वी आनंद झाला.”
मनीषा पाटे (वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त)
“मी भारतीय सैन्यात असल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही.मात्र व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ पाहून मन भारावून गेले.पुढील स्नेहसंमेलनाला नक्की उपस्थित राहीन.”
संपत येवले (भारतीय सैनिक)